Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 48

राबणारी माणसे सुंदरच दिसतात

$
0
0

आपल्यावर लहानपणापासून कळत-नकळत होणाऱ्या संस्कारांतूनच आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान, आपले 'अध्यात्म' घडत जाते. या लेखात आईकडून झालेल्या संस्काराविषयी लिहावेसे वाटते.

माझ्या आईचे नाव ललिता. कॉम्रेड तिला 'ल' म्हणून हाक मारायचे व बहुधा त्यामुळेच इतरांनी तिला 'लताई' म्हणायला सुरुवात केली. आम्ही पाच मुलेही तिला 'लताई' किंवा संक्षेपाने 'लती' असे म्हणू लागलो. वडलांना 'कॉम्रेड' व आईला 'लती' अशा जगावेगळ्या नावांनी हाक मारणारे आमचे कुटुंब आजूबाजूच्यांना खूपच विचित्र वाटत असणार!

बघावे तेव्हा लती काही ना काही कामात गर्क असायची. शिक्षिकेचा पगार तो कितीसा असणार. वेगवेगळे वेतनआयोग लागू होण्यापूवीर्चा तो काळ. घरी पाच मुलगे. शिवाय घरात नातेवाईकांचा, पाहुण्यांचा कायम राबता. पै-पै वाचवत तिने संसाराचा गाडा रेटला. अर्थात त्याबद्दल तिची शब्दानेही कधी तक्रार नसायची. कॉम्रेडांशी लग्न केले तेव्हाच, आयुष्य काबाडकष्ट करत जगावे लागेल हे तिने स्वीकारले होते.

काम करता करता ती खूपदा मोठ्या आवाजात कविता म्हणत असे. कवितांची तिला प्रचंड आवड. माझ्यातील साहित्यप्रेम हे तिच्याकडूनच आले असावे. पाठांतरावर तिचा भारी भर. तिने आमच्याकडून शालेय अभ्यास असा कधीच करून घेतला नाही, पण रोज एकतरी श्लोक पाठ केल्याशिवाय जेवायचे नाही, असा तिचा दंडक होता. यात धामिर्क विचार नव्हता; पण पाठांतरामुळे स्मरणशक्ती वाढते, उच्चार शुद्ध होतात, यावर तिचा विश्वास होता. सहावी-सातवीत असतानाच माझी संपूर्ण भगवद्गीता तोंडपाठ होती- अर्थ मात्र फारसा कळत नव्हता.

पण लतीचा माझ्यावर झालेला सर्वात मोठा संस्कार म्हणजे श्रमप्रतिष्ठा- कुठलेही कष्टाचे काम न लाजता, न वैतागता सातत्याने करत राहण्याचा स्वभाव. तुटपुंज्या पगारात थोडीफार भर घालता यावी म्हणून तिने आयुष्यभर कष्टाचे डोंगर उपसले. लोणची-पापड-शिकवण्या वगैरे तर नेहमीचेच, शिवाय बकऱ्या पाळण्यापासून ते बकुळीच्या फुलांचे हार करून विकण्यापर्यंत अनेक अविश्वसनीय उपद्व्याप तिने संसारासाठी केले. शक्यतो ती सगळीकडे पायीच जायची. कधी अपरिहार्य म्हणून बसने प्रवास करावा लागला तर तिकिट पाच पैसे कमी बसावे म्हणून ती दोन स्टॉप आधीच उतरायची व ते अंतर पायीच चालायची. भाजणी वगैरे गिरणीत न देता घरीच जात्यावर दळायची. रोज शेगडी पेटवायची व त्यात कोळसे कमी लागावेत म्हणून घरातला केरकचराही शेगडीतच टाकायची. त्यामुळे मग घरभर धूर झाला तरी तिची हरकत नसायची.

स्वस्त मिळते म्हणून लती लांब भायखळ्याहून भाजी आणायची. त्यातली थोडी स्थानिक भावाने शेजाऱ्यापाजाऱ्यांना विकली की, त्या फायद्यात आम्हाला घरच्यांसाठी लागणारी भाजी सुटायची. 'एका किलोच्या पैशात तिथे अडीच किलो भाजी मिळते,' ती म्हणायची. पण तो घाऊक बाजार असल्याने तिथे कुठलीच भाजी अडीच किलोपेक्षा कमी मिळत नसे. त्यामुळे भाज्यांचे एकूण वजन खूप व्हायचे. साधारण दहा-पंधरा किलो वजनाच्या भाज्या दोन पिशव्यांमध्ये भरायच्या, दोन्ही हातात त्या धरून भाजीबाजारातून भायखळा स्टेशनवर यायचे, माटुंग्याला उतरायचे, लांबलचक पूल ओलांडून रस्त्यावर यायचे व मग तिथून थांबत थांबत किंग्ज सर्कलला घरी पोचायचे. वजन असह्य झाले, तर लती वाटेतल्या ओळखीच्या दुकानात एखादी पिशवी मागे ठेवायची आणि मग मी किंवा दुसरे कोणीतरी जाऊन ती घरी घेऊन यायचो. हाशहूश करत घरी पोचल्यानंतरचा, उन्हाने लालबुंद झालेला तिचा चेहरा मला आजही स्पष्ट आठवतो.

या सगळ्या कष्टांची लतीला कधीच लाज वाटली नाही वा त्यांचा तिने कधीच बाऊही केला नाही. उलट हे तिने हसतमुखानेच केले. श्रमप्रतिष्ठा म्हणजे काय हे मी माझ्या आईपासून शिकलो. आजही अंग मोडून कष्ट करणारी कोणीही व्यक्ती बघितली की मला भरून येते, त्या व्यक्तीविषयी आपुलकी वाटते; मग तो गाडीखाली आडवा झालेला गॅरेजमधला मेकॅनिक असो, घामाने डबडबलेला हातगाडीवाला असो वा लाकडाला रांधा मारणारा सुतार असो. राबणारी माणसे मला नेहमी सुंदरच दिसतात.

- भानू काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 48

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>