Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 48

मूळचे आणि उपरे!

$
0
0

प्रवाशांनी गच्च भरलेली गाडी जलपैगुडी स्टेशनात शिरली आणि कसेबसे आम्ही डब्यात शिरलो. रात्रीची वेळ. त्याच दिवशी सुभाष घीशिंग यांच्या गुरखालँड समर्थकांनी १०० तासांचा सार्वत्रिक संप पुकारला होता. गुरखा हेच इथले मूळ रहिवासी आहेत, बाकीचे सगळे बंगाली-बिहारी-आसामी हे घुसखोर आहेत व त्या उपऱ्यांनी इथून निघून जावे ही त्यांची मागणी होती. वातावरण कमालीचे तंग होते. आमच्यासारखे पर्यटक जीव मुठीत धरून दाजिर्लिंगहून येथे पोचलो होती. एकदाची गाडी सुटली.

रात्री केव्हातरी टॉयलेटला जाण्यासाठी उठलो, तेव्हा बाहेर दाराशीच बसलेला एक लहान मुलगा मला दिसला. गुडघे पोटाशी घेऊन जमिनीवर बसलेला. जेमतेम चौदा-पंधरा वर्षांचा असेल. माझी चाहूल लागताच त्याने मान वर केली. आमची नजरानजर झाली. तो खूप भेदरलेला दिसला. का कोण जाणे, मला त्याची दया आली. 'माझा एखादा शर्ट त्याला देऊन टाकतो', असे मी सीटपाशी परतल्यावर पत्नीला म्हटले. 'आता खूप रात्र झाली आहे, उद्या सकाळी दे,' ती झोपेतच पुटपुटली. 'बरं' म्हणत मी झोपी गेलो. जरा वेळाने अचानक आम्ही दोघेही जागे झालो. दारावर कोणीतरी जोरजोरात ठोठावत होते.

हलकेच मी कुपेचे दार उघडले. बाहेर दोन-तीन पोलिस उभे होते. 'कोन है अंदर?' म्हणत त्यांनी आत डोकावून पाहिले, एकवार माझ्यावरून नजर फिरवली, आणि 'ठीक है' म्हणत ते निघून गेले. पण काही मिनिटांतच मी खडबडून पुन्हा जागा झालो. बाहेरून किंकाळण्याचा व लाथाबुक्क्यांचा आवाज येत होता. दर किलकिले करून मी बाहेर पाहिले. ते पोलिस त्या मुलाला अमानुषपणे बुकलून काढत होते. मला ते बघवेना. पण मध्ये पडायची हिंमतही होईना. दहा-पंधरा मिनिटांनी पुन्हा बाहेर शांतता पसरली. पहाटे केव्हातरी गाडी थांबली. मालदा जंक्शन आले होते. चहा घ्यावा का असा विचार करत होतो तेवढ्यात समोरचे दृश्य बघून स्तंभितच झालो. प्लॅटफॉर्मवर दोरखंडानी घट्ट जखडलेली दहा-बारा माणसे बसली होती. शेजारी पोलिस पहारा होता. 'बांगलादेशी घुसखोर' कोणीतरी म्हटले. पण माझे डोळे त्या माणसांवरच खिळले होते. त्या दहा-बारांमध्ये 'तो'ही होता. अंगावर जागोजागी मारहाणीच्या खुणा. मी त्याला 'घुसखोर' म्हणू शकलो नाही. काही क्षण आमची नजरभेट झाली आणि गाडी पुढे सरकली. पण मनात त्याची ती भेदरलेली नजर रेंगाळत राहिली.

मूळचे आणि घुसखोर, भूमिपुत्र आणि उपरे हा भेद तेव्हापासून आजतागायत मला अस्वस्थ करत आला आहे. तसे पाहिले तर पोटापाण्यासाठी गेली हजारो वषेर् माणूस सतत स्थलांतर करत आला आहे, अगदी पशुपक्षीदेखील तसे भटकेच असतात. आपण फारतर दोन-चार पिढ्या मागे जाऊ शकतो, पण त्याच्यापूवीर् आपले पूर्वज कुठे होते हे खात्रीपूर्वक सांगणे कठीणच आहे. तामिळ अस्मितेचे जनक रामस्वामी नायकर मूळचे कन्नडिगा तर तामिळनाडूने ज्यांचे नेतृत्त्व स्वीकारले ते भारतरत्न एम. जी. रामचंदन मूळचे केरळचे. लाओसमध्ये व्हिएटनामी आहेत आणि युनायटेड स्टेट्समध्ये मेक्सिकन, कॅनडात सरदारजी आहेत आणि जर्मनीमध्ये तुकीर्. पुन्हा हे सगळे स्थलांतर कायदे पाळून झालेले मुळीच नसते. अगदी आदिवासींच्या झारखंडमध्येही आज 'मूळवासी' स्वत:च्या हक्कांसाठी भांडत आहेत. दाजिर्लिंगमधून 'बाहेरच्यांना' हाकलून लावू पाहणारे घीशिंगही स्वत: कदाचित नेपाळहून आले असतील.

'मूळचा' आणि 'उपरा' हा भेद मोठ्या गुंतागुंतीचा आहे. डीएनएचे तज्ज्ञ म्हणतात, आपण सगळेच मानव मूळचे आफ्रिकेतले; आपली नाळ जोडली गेली आहे जेनी हे काल्पनिक नाव असलेल्या एका आफ्रिकन महिलेशी! खोलात जाऊन विचार केला तर आपण सारेच उपरे आहोत.

प्रवाशांनी गच्च भरलेली गाडी दादर स्टेशनात शिरली आणि कसाबसा मी डब्यात शिरलो की, चर्चगेट वा बाँबे सेंट्रलपासून बसून आलेले प्रवासी काही मला सुखासुखी जागा देत नाहीत; जेमतेम बूड टेकवता येईल एवढीच 'चौथी सीट' देतानाही त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव त्रासिकच असतो; कारण माझा जन्म परळचा असला आणि बरेचसे आयुष्य किंग्ज सर्कलला गेलेले असले, तरी त्यांच्या दृष्टीने मी तेव्हा उपराच असतो!

- भानू काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 48

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>